Type Here to Get Search Results !

समर्थ युवा महोत्सव जल्लोषात संपन्न.



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर 

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,बेल्हे आयोजित "समर्थ युवा महोत्सव २०२५" नुकताच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे संपन्न झाला.

"समर्थ युवा महोत्सव २०२५" साठी चे लोगो अनावरण संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.आपल्या ग्रामीण भागातील तरुणांना एक संधी देण्यासाठी अनेकविध प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन केले जाते.या स्पर्धांच्या माध्यमातून युवा मनाचे स्पंदन जपण्याचा प्रयत्न हा संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे.ही संधी आहे,स्वतःला सिद्ध करण्याची,स्वतःचे कलागुण जाणून घेण्याची.त्यामुळे सर्वांनी या समर्थ युवा महोत्सवामध्ये जाणीवपूर्वक सहभाग घ्यावा असे आवाहन यावेळी डॉ.अमोल कोल्हे यांनी केले.



या युवा महोत्सवाची सुरुवात शोभायात्रा व ग्रंथ दिंडीने करण्यात आली.हातामध्ये वारकरी संप्रदायाची भगवी पताका घेऊन टाळ आणि मृदुंगाच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा-तुकोबा या नावाचा जयघोष करत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माई ची पालखी फुलांनी सजवली होती. 

सुप्रसिद्ध शिवव्याख्याते व प्रेरणादायी वक्ते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते दिंडीचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना यशाला शॉर्टकट नसतो.जिद्द,मेहनत आणि कष्टानेच यश मिळवावे लागते. स्वतःच स्वतःला विजयी करू शकतो अशा प्रकारच्या सकारात्मक विचारांची पेरणी उपस्थित विद्यार्थी मनामध्ये आपल्या व्याख्याना मार्फत केली.

दुपारच्या सत्रात प्रा.गणेश शिंदे यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने जीवन कसे सुंदर आहे याचा प्रत्यय विद्यार्थ्यांना आला.

अभिजीत जाधव व अमर जाधव यांच्या शिवगर्जना ह्या स्फूर्ती गीतांच्या कार्यक्रमाणे रंगत आणली.



मराठी चित्रपट सृष्टीतील सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत हा समर्थ महोत्सव म्हणजे उभरत्या कलाकारांसाठी एक खुलं व्यासपीठ असल्याचे मत व्यक्त केले.

सुप्रसिद्ध हास्यसम्राट,नकलाकार "हास्यकल्लोळ" फेम प्रा.दिपक देशपांडे यांनी विविध कलाकारांचे तसेच प्रसिद्ध व्यक्तींच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करून व मिमिक्री तसेच विनोदी कार्यक्रमाणे धमाल उडवून दिली

कवी कांतासुत प्रमोद घोरपडे यांच्या भावस्पर्शी कवितांनी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आई वडिलांविषयीच्या मायेची जाणीव जागृत झाली.

प्रसिद्ध गझलकार विश्वास पाटील यांनी त्यांच्या प्रसिद्ध गझल सादर केल्या.

सचिन भांगरे यांनी रिदमिका बँड मार्फत विविध प्रकारच्या वाद्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.वाद्यांची जुगलबंदी त्याचप्रमाणे सुमधुर गायलेलं गीत यामुळे विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात सचिन भांगरे यांच्या रिदमिका बँडचं मनापासून स्वागत केलं.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख नृत्य दिग्दर्शक सागर रोकडे यांनी विद्यार्थ्यांपुढे बहारदार नृत्य सादर करून वेगवेगळ्या नृत्य शैलीचे दर्शन घडवले.

प्रसिद्ध गायक व समर्थ शैक्षणिक संकुलाचे संगीत शिक्षक राहुल दुधवडे यांनी एक से बढकर एक गाण्यांचा नजराणा पेश करत विद्यार्थ्यांची मने जिंकली 

यावेळी संकुलातील विद्यार्थ्यांनी भक्ती शक्ती,जागर स्त्री-शक्तीचा-नारीचा,लेजंडस ऑफ इंडिया,श्रावण सरी,ऐतिहासिक गाडी शिवशंभो स्तुती,अंत:प्रेरणा यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या थीमला अनुसरून सांस्कृतिक कार्यक्रमांचा कलाविष्कार पॉलिटेक्निक,इंजिनिअरिंग,कॉलेज ऑफ फार्मसी,इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,बीसीएस,आयटीआय,टोयोटा,लॉ,पॅरामेडिकल,नर्सिंग च्या विद्यार्थ्यांनी सादर केला.

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक व निर्माते महेश कोठारे यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व थीम सादर करणाऱ्या सर्व महाविद्यालयांना ढाल देऊन गौरविण्यात आले.युवा महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा,गीत-गायन स्पर्धा,नृत्य स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,मेहंदी स्पर्धा,पत्रलेखन स्पर्धा,पॉट पेंटिंग व लोगो डिझाईन स्पर्धा,सामान्य ज्ञान स्पर्धा,क्रीडा प्रश्नमंजुषा स्पर्धा,भित्तीपत्रक स्पर्धा तसेच संग्रहित वस्तूंचे संकलन आणि टाकाऊ पासून उपयुक्त वस्तूंचे प्रदर्शन या सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.शालेय गटामधून जुनिअर कॉलेजला तर महाविद्यालयीन गटामधून समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयांना "समर्थ करंडक" देऊन गौरविण्यात आले.क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये विजेत्या समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स या महाविद्यालयास "समर्थ चषक " देण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,क्रीडा संचालक एच पी नरसूडे सर तसेच सर्व विभागातील प्राचार्य,विभाग प्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि जवळपास ५५०० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार बीसीएस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप यांनी मानले.

Post a Comment

0 Comments